नवी दिल्ली : ओडिशामध्ये नुकत्याच आलेल्या फनी वादळामुळे संपूर्ण राज्यभरात नुकसान झाले. या वादळानंतर आता ओडिशातील सुमारे १० दशलक्ष नागरिकांची अनियमित वीज पुरवठ्यामुळे गैरसोय होत आहे. भुवनेश्वरसह बहुतांश किनारपट्टीभागातील सुमारे एक लाख वीजेचे खांब उन्मळून पडले असून, अनेक सबस्टेशन आणि लो ट्रान्समिशन लाइन्स पूर्णपणे बंद पडल्या आहेत. ही परिस्थिती लक्षात घेऊन नुकसान झालेल्या वीज पुरवठ्याच्या दुरुस्तीसाठी ‘टाटा पॉवर-डीडीएल’ने आपल्या नियमित कार्यचलनातील २५ अभियंते आणि तंत्रज्ञांची एक टीम राज्य सरकारच्या साह्यासाठी रवाना केली आहे.
ओडिशाला रवाना होण्यापूर्वी तेथील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी या टीमने भारतीय हवामान खाते (इंडियन मेटेओरॉजिकल डिपार्टमेंट-आयएमडी), राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन मंडळ (नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी- एनडीएमए) आणि ओडिशा राज्य प्रशासनाकडून माहिती घेतली आहे.
‘टाटा पॉवर’चे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक प्रवीर सिन्हा म्हणाले, ‘गरजेच्या वेळी इतर भारतीयांच्या मदतीस उभे राहणे हे ‘टाटा पॉवर’चे मूळ तत्त्व आहे. या वादळावर नियंत्रण मिळवण्यात यश आल्याने आपले जागतिक स्तरावर कौतुक झाले. आता आपल्या लक्ष्यित प्रयत्नांतून ओडिशाला पुन्हा उभे करण्यास एकत्र येऊया. आमची अभियंते व तंत्रज्ञांची टीम सर्व सामुग्रीसह ओडिशाला पोहोचली आहे आणि तेथील वीज पुरवठा वेगाने सुरळीत करण्यात साह्य करत आहे.’
‘टाटा पॉवर-डीडीएल’चे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय बंगा म्हणाले, ‘वीज पुरवठा लवकरात लवकर सुरळीत झाल्यास इतर मदत आणि पुनर्वसन कार्यात लक्षणीय वेग गाठता येईल. यातून जनतेला आत्मविश्वास मिळेलच. शिवाय, परिस्थिती नियंत्रणात आहे, असा संदेशही यातून पोहोचेल. ओडिशाला वेगाने पूर्ववत करण्यासाठी साह्य करण्यात आम्हाला आनंद आहे.’
‘टाटा पॉवर सोलार’तर्फे ग्रामस्थांना तातडीचे साह्य करण्यासाठी चार हजारांहून अधिक सौर कंदिलांचे वाटप करण्यात आले. वीज पुरवठा पूर्ववत करण्यात ‘टाटा पॉवर’च्या टीमला टाटा स्टील-कलिंगनगर आणि जेयूएससीओ यांचेही साह्य लाभले आहे. एअर विस्ताराने या टीमला त्यांची संपूर्ण हवाई प्रवास आणि सामान वाहतूक सेवा देऊ केली आहे. टाटा ट्रस्ट आणि टाटा प्रोजेक्ट्स कम्युनिटी डेव्हलपमेंट ट्रस्ट वादळग्रस्त भागाला पिण्याचे पाणी पुरवत आहे.
गरजेच्या वेळी देशवासियांना मदत करण्यात टाटा ट्रस्ट नेहमीच आघाडीवर असून, केरळमध्ये आलेल्या भयंकर पुरानंतरही ‘टाटा पॉवर’ने केरळ राज्य विद्युत मंडळाच्या ४७३ किमी लांबीच्या केबल्स पुरवून विद्युत पुरवठा वेगाने सुरळीत करण्यास साह्य केले होते. उत्तराखंडमधील दुर्घटनेनंतरही ‘टाटा पॉवर’चे अभियंते आणि तंत्रज्ञ उत्तरांचल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (यूपीसीएल) साथीने उभे राहिले आणि रुद्रप्रयाग जिल्ह्यातील उत्तरकाशी व उखीमठ तसेच चामोली जिल्ह्यातील जोशी मठ आणि नरेनबागर येथे विक्रमी वेळात ३३ केव्ही आणि ११ केव्हीच्या लाइन्सचे काम पूर्ण करण्यात आले. जून २०१४मध्ये दिल्लीला वादळी वाऱ्यांचा तडाखा बसल्यानंतर ‘टाटा पॉवर’ आणि दिल्ली सरकारचा संयुक्त उपक्रम असलेल्या ‘टाटा पॉवर-डीडीएल’ने वीज पुरवठ्याचा प्रश्न अत्यंत कुशल पद्धतीने हाताळला होता.